मी रु.१,७६,०००/- २० एकर शेतीत गुंतविले आणि मला रु.२,२६,०००/- मिळाले असे राऊत म्हणाले. त्यात शेतमजुरी सामिल आहे. मनोज खिरडे म्हणाले की त्यांनी १० एकर शेतात रु.६०,०००/- गुंतविले आणि रु.१,२०,०००/- मिळाले. त्याचबरोबर शिकरे उठले व म्हणाले आम्ही सोयाबीन आणि तूर उत्पादीत करतो. पण ह्या वर्षी भावच नाही. अत्यंत हतबल झालो. म्हणून मी विक्रीच केली नाही. २० पोती सोयाबीन मी विकलेच नाही. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी शेळी पालन करतो, पण ह्या वर्षी दर पडले. ५०% कमी दर मिळाला. सोबत १४ शेळ्या मेल्या. माझ्यावर १ लाख रुपये कर्ज आहे. कुठलीही बँक आता कर्ज द्यायला तयार नाही. रमाताई राऊत पुढे आल्या व म्हणाल्या माझी मुले शिकत आहेत. वर्षाला ५०,००० रुपये शेतीत मिळाले, त्यात काय होणार? इतर खर्च एवढे आहेत की कर्ज घेऊन जगतो. ५% व्याजाने कर्ज उचलले आहे. सर्व जीवनच कर्जावर चालले आहे. राजा सोनावणे हा विद्यार्थी अमरावती येथे शिकत आहे. त्याच्या आईने त्यांची दारूण परिस्थिती समोर ठेवली. ३ मुले शहरात शिकत आहेत. त्यांचा खर्च कर्ज घेऊन करतो. तिच्या मुलांनी सांगितल की मेस लावली १२०० रू., खोलीसाठी १५०० रू., कधीकधी मी कॉलेजला जात नाही. कारण कॉलेज लांब आहे. प्रवासाला पैसे नसतात.
जामदार गावातील आपल्या देशबांधवांचे दु:ख आणि शोषण प्रकट होत होते. मानवाची हतबलता दिसून येत होती. सापळ्यात अडकलेल्या जनावरासारखी शेतकऱ्यांची तडफड बघवली जात नव्हती. वाशिम जिल्ह्यातील हे गाव. शेती हा मुख्यव्यवसाय. अनेक वर्ष नुकसान सोसून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी शेतीवर बहिष्कार घातला होता. त्यावेळी मी तिथे गेलो व विस्तृत चर्चेनंतर मी सांगितले की, असे करू नका. आपण सर्व मिळून शेती करू. शेतकऱ्यांनी मान्य केले व आम्ही सर्वांनी आपले योगदान दिले. पाऊस चांगला झाला शेतीमध्ये उत्पन प्रचंड झाले. पण वरील प्रतिक्रियेमधून स्पष्ट होते की, पिक चांगले आले पण शेतकऱ्यांच्या हातात शून्य. ही उत्पादकता वाढवणाऱ्या शेती व्यवस्थेची शोकांतिका आहे.
उत्पादन वाढवा आणि आत्महत्या करा. ही आजची शेती व्यवस्था आहे. मानवाच्या उत्क्रांतीत हा भयानक प्रलयकाळ आहे. मरण्यासाठी शेती करणे हे आजच्या व्यवस्थेचे सत्य आहे. पण ते कोणी मानायला तयार नाही. कारण नेते स्वत: आणि कुटुंबाला सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. ह्याच देशात अश्लिल श्रीमंतीत अंबानी रु.१२,००० कोटीच्या बंगल्यात राहतो. एका लग्नावर कोट्यावधी रुपये खर्च करणारे लोक आहेत. पण शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या घरात चूल पेटते का नाही हे कुणा कलेक्टरला किंवा नेत्याला माहित नाही. लाखोंनी रुपये उंची मध्यावर खर्च करणारे लोक ह्याच देशात राहतात आणि कोट्यावधी भारतीय मुलांना एक ग्लास दुध मिळते की नाही ह्याची काळजी कुणाला नाही. जामदार गावच्या शेतकऱ्यांनी ह्यावर उपाय दिला. मनोहर म्हणाले की, आता शेतकरी आपल्या मुलांना सांगतो की शिका आणि नोकरी करा. ह्या गावात राहू नका. आपण शेती विकू आणि शिक्षण करू. वातानुकुलीत वातावरणात राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणारे लोक ही सत्य परिस्थिती का नाकारतात. नाना पाटेकरनी ‘नाम’ ट्रस्टकडून काही लोकांना भिक घालणे, हा काय उपाय होऊ शकत नाही. शेतकरी स्वाभिमानी आहे म्हणूनच आत्महत्या करतो.
त्यात शरद पवारांना शेतकऱ्यांचा पुळका यावा म्हणजे हा राष्ट्रीय विनोद आहे. ह्या काँग्रेसवाल्यांनी संघर्ष यात्रा काढावी म्हणजे बलात्कार करणाऱ्या माणसाशी लग्न लावून देण्यासारखे आहे. १५ वर्ष ह्यांनी महाराष्ट्रात सत्ता गाजवली आणि आता चोरानो उलट्या बोंबा मारताय काय? शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा पैसा हडप करून विकत घेतलेल्या मर्सिडीज गाड्यात संघर्ष यात्रा काढताय. लाज वाटत नाही. तुमच्यापेक्षा भाजपवाले बरे. कारण ते उघडपणे सांगतात की, शेतकऱ्यांशी आमचे काही देणे घेणे नाही. व्यापारी, उद्योगपतींसाठी आम्ही काम करतो. फसवत तरी नाहीत. बच्चू कडूनी तुमच्या आधी जाहीर केलेली असूढ यात्रा अत्यंत कष्टात यशस्वी केली. त्यांनी खरा संघर्ष केला. तर त्यांनाच बदनाम करत आहात.
मी जामदार गावातअसे सांगितले कि, आपण स्वत:च आपले संरक्षण केले पाहिजे. पहिले म्हणजे पाणी, त्याचे नियोजन सरकारी कार्यक्रमातून व स्वावलंबनातून केले पाहिजे. दुसरे म्हणजे शेतीला जनावरांचा उपद्रव थांबवला पाहिजे. शेतकरी शेतात झोपून पिक राखतो. त्याला जनावरे फस्त करून टाकतात. DFO ने जामदारा गावाला भेट दिली पण काहींच केले नाही. जि.प.सदस्य अहमदाबादकर आणि प्रा.उल्हास जाधवनी तारेच कुंपण गावाभोवती घालण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी घेतली व पाणी निर्माण करण्यासाठी तयारी दाखवली. त्याचप्रमाणे गावात झिरो बजेट शेती करण्याचा निर्णय घेतला. पद्मश्री पाळेकरांचे शास्त्र वापरणे हे आजच्या काळातील उपाय आहे. पिकामध्ये विविधता आणून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजेच आरोग्य, शिक्षण, क्रीडा व कौशल्य या सर्व क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची झपाटणे प्रगती व्हायला पाहिजे होती. कारण समृद्धी म्हणजे केवळ पैसा नव्हे. तर शाश्वत जीवन पद्धती म्हणजे समृध्द किसान. मूळ सिद्धांत उत्पादकता वाढवण्यापेक्षा उत्पन्न वाढवण्यावर भर दिला पाहिजे. कृषी धोरणाचे अपयश ह्याच कारणामुळे आहे. सरकारी यंत्रणा, विद्यापीठे सर्व रासायनिक शेती आणि उत्पादकता वाढवा म्हणते. उत्पादन कुठे विका हे सांगत नाहीत. पैसे कसे मिळणार हे सांगत नाहीत. मी स्वत: कृषी विज्ञान केंद्र चालवतो. कृषी महाविद्यालय चालवतो. येथिल शिक्षण शेतकऱ्यांचे खून पाडण्यासाठी आहे असे वाटते. म्हणून मी ICAR आणि विद्यापिठांना कृषी विज्ञान केंद्राचा रोल उत्पन्न वाढवण्यासाठी असावा असा आग्रहाचा प्रस्ताव दिला आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करून Goback to roots(आपल्या मुळाकडे जावा)हे तत्व स्विकारूआणि शेतकरी समृध्द करण्यासाठी आपणच कष्ट करू असे मी जामदाऱ्यातीलशेतकऱ्यांना सुचविले. आता २ मे ला जामदार गावातह्या विषयावर ‘जामदारा पॅटर्न’ हा कृती कार्यक्रम निर्माण करू.