परवा एका गावात गेलो असताना एका मुलीने विचारले धर्म कशासाठी असतो? खरोखर हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. मानव कृषी संस्कृतीमध्ये समाविष्ट झाला. रानटी मानव सुसंस्कृत होण्यास सुरू झाले. त्याने 10000 वर्षा पूर्वीपासूनशेती सुरू केली. त्यामुळे मानव स्थिरावला, त्याने घर बांधले. त्याचे गावात रूपांतर झाले. समाज निर्माण झाला. आर्थिक दृष्ट्या संपन्नता येऊ लागली. त्याचबरोबर राजकारण सुरू झाले. सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली आणि धर्माचा वापर देखील राजकरणासाठी सुरू झाला. त्याचबरोबर वादळ, वारे, वणवे, अतिवृष्टी, भूकंप अशा प्रकारांना मानव घाबरायचा आणि त्यामधूनच एक अज्ञात शक्तीचा जन्म झाला. त्याला मानव देव म्हणू लागला आणि त्याची पूजा करू लागला. पण देवाला कोणीतरी एजंट लागतो अशी एक प्रथा समाजात निर्माण झाली, पुजाऱ्याच्या जन्म झाला. तेथे राजा, पुजारी आणि सावकार यांचं वर्चस्व वाढलेआणि सामान्य माणसाला हैराण करणारी व्यवस्था निर्माण झाली. व्यवस्था म्हणजे राज्याची व्यवस्था अशी निर्धारित करण्यात आली.
ह्या व्यवसथेत फुकट मजुरी करणारी माणसे पाहिजे होती. म्हणून पश्चिम राष्ट्रांमध्ये गुलामगिरी मोठ्या प्रमाणात बसली आणि भारतामध्ये चातुवर्णाची निर्मिती झाली. त्यामध्ये क्षुद्र जाती नेमल्या गेल्या आणि त्यांनी फक्त उच्च जातीच्या लोकांसाठी फुकट मजुरी करायची ही प्रथा समाजात रूढ झाली, धर्माचा ऱ्हास त्याच्यामध्ये झाला. कारण क्षुद्र जातीमध्ये आणि वैश्य समाजामध्ये लढण्याची क्षमता नव्हती. परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली. या देशांमध्ये पोकळी निर्माण झाली आणि ज्यावेळेला परकीय आक्रमण झाले त्या वेळेला आपण हतबल झालो. मोठी जमात असून सुद्धा आपण प्रतिकार करु शकलो नाही आणि म्हणून त्यातून देश गुलाम झाला.आपल्याला धर्म आणि माणुसकी यांच्यात काय संबंध आहे हे बघितले पाहिजे. भारताच्या हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर सुरुवातीला ऋग्वेदात चातुवर्ण नव्हता.चातुवर्णकामाच्या आधारावर निर्धारित केला जात होता, पण कालांतराने हा अनुवंशिक झाला.
सम्राट अशोकाच्या काळामध्ये, चातुवर्णनष्ट केला गेला. म्हणून भारत समृद्ध होता. जगातील सर्वात श्रीमंत देश झाला. ह्यालाच आपण ‘सुवर्णयुग’ म्हणतो. जगाच्या पाठीवर अनेक धर्म निर्माण झाले. सुरुवातीला ह्या सर्व धर्मामध्ये माणुसकी हा प्रथम धर्म होता. धर्माकडे बघितल्यास माणसाने चांगल्याप्रकारे वागले पाहिजे व माणूसकीची कास धरली पाहिजे अशी शिकवण होती. वेगवेगळ्या भागांमध्ये येथील समाजाने वेगवेगळे धर्म स्विकारले.सोबत राजकारण वेध घेत होते. एका समूहाने दुसऱ्या समूहावर आक्रमण केले. या आक्रमणासाठी धर्माचा उपयोग होऊ लागला व त्यातूनच माणुसकीच्या आधारावर जे धर्म उभे राहिले होते ते दुसऱ्या समूहाचा द्वेष करू लागले आणि पूर्ण जगामध्ये धर्माच्या नावावर अनेक युद्ध सुरू झाली. जसे मध्य आशियामध्ये इस्लामची राजवट आल्यावर ख्रिश्चन धर्माने क्रुसेड निर्माण केले. जेणेकरून धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली इस्लामिक राष्ट्रावर हल्ले सुरू झाले. त्याचा दुष्परिणाम पूर्ण जगामध्ये झालेला आहे. अशाच प्रकारे इस्लाम धर्माचे लोक भारतावर आक्रमण करू लागले, तेव्हा त्याला धर्मयुद्ध घोषित केले.
बाबर जेव्हा भारतात आले तेव्हा ते कुठलाही धर्म पाळत नव्हते. पण राणा संघाबरोबर अनेक युद्ध हरल्यानंतर, त्यांनी जिहाद करायची घोषणा केली. पण येथील धर्मगुरूंनी त्याला सांगितलं तुम्ही इस्लाम पाळत नाही,दारू पिता,व्यभिचार करता, मग तुम्ही मुसलमान कसे?. त्यावेळी बाबरने जाहीर केले की मी आता दारू सोडणार आणि व्यभिचार पण करणार नाही. एक सच्चा मुसलमान सारखं वागेन. त्यावेळी धर्मगुरूंनी जिहाद करण्यास संमती दिली. मग जिहाद पुकारून त्याने राणा संघाबरोबर पुन्हा युद्ध केले. दुर्दैवाने अनेक राजपूत नेत्यांनी राणा संघाला साथ दिली नाही आणि त्याचा युद्धात मृत्यू झाला. विजयी झाल्यानंतर बाबरने पुन्हा दारू प्यायला सुरू केली आणि कुठल्याही परिस्थितीत धर्माला झुगारून दिले.
यावरून स्पष्ट दिसते की धर्माचा दुरुपयोग कशाप्रकारे राजकारणासाठी केला गेला. हीच परिस्थिती सगळीकडे वाढली. देश गुलाम झाला. ह्याला वळण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. त्यांनी रयतेचे राज्य स्थापन केले. रयत म्हणजे कुठल्याही धर्माची असेल त्यांना अभय दिले. त्यांना स्वराज्यात सामील केले. शेतकऱ्यांचे संरक्षण, शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान करणे. सर्व जाती धर्मांना आपलेसे करणे. चातुवर्णनष्ट करणे अशा अनेक राजकीय आणि सामाजिक विषय त्यांनी अंमलात आणले आणि म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले. त्याच्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीने तेच तत्त्व अंमलात आणले. विशाल राष्ट्र निर्माण झाले, ज्यांनी अटकेपार झेंडा लावला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणावरून एक स्पष्ट दिसते की रयत ही आपलीच असते. तिला आपलेपणा दिला तर ती राष्ट्रासाठी आणि राजासाठी मर मिटायला तयार असते. हे तत्व महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्विकारून भारताची घटना बनवली आहे. तोच आपला धर्म आहे आणि तीच आपली दिशा आहेत. राष्ट्रामध्ये द्वेषभावना निर्माण करून कुठलीही राष्ट्र मोठे होऊ शकत नाही आणि म्हणून सर्व नागरिक कुठल्याही धर्माचे, जातीचे असेल आणि एकसंघपणे काम केले पाहिजे व राष्ट्रासाठी मर मिटायला तयार पाहिजे.
भारतीय सैन्यामध्ये हेच तत्त्व अंमलात आणलेले आहे. मी 8 वर्ष काश्मिरमध्ये दहशतवाद्यांची झुंज देत होतो. त्यावेळेला हेच तत्व पाळले. 1995 साली 2500 दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावले. ही सगळी तरुण मुले होती. पण त्यांची कत्तल व्हायला सुरू झाली. आम्ही त्यांना प्रत्येकाला एक रायफल दिली होती. पण त्यांची वाईट परिस्थिती निर्माण झाली. ज्यावेळेला मी कारागिल युद्धात गेलो होतो, त्यावेळेला ही मंडळी भेटली आणि म्हणू लागले “साहब हम गाव भी नही जा सकते, शहर में भी नही रह सकते, हमारे 1000 लोग मारे गए है, कुछ तो करीए| मग कारागिल मध्ये संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस आले असताना त्यांच्या समोर हा विषय ठेवला व त्यांच्याजवळ मागणी केली की या सर्वांना सैन्यात घ्या. याला प्रचंड विरोध झाला. आत्मसमर्पित दहशतवाद्यांना सैन्यात घेण्याची कल्पना कुणाला रुचली नाही. त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी मला विचारले की यापैकी किती लोक पळून जातील. मी म्हणालो नेहमी सारखे 2-3 लोक पळून जाऊ शकतात. त्यावर पंतप्रधानांनी लगेच आदेश दिला व आम्ही 8000 काश्मिरी लोकांचे सैन्य बनवले. आज देखील गुगलवर मी बघितले तर HOME &HEARTH बाबत माहिती मिळेल. या लोकांनी भारतीय सैन्याला प्रचंड मदत केली व 2010 पर्यंत काश्मिर मधील दहशतवाद संपला. आता पुन्हा सुरू झाला आहे. तो कशामुळे?
राष्ट्रभक्ती कुठल्या धर्माची मक्तेदारी नाही. कारागिल भागातले सर्व धर्माचे लोक भारताबरोबर प्रामाणिक आहेत. 1971 च्या युद्धात तेथील अनेक भागावर आपण कब्जा केला. सर्व गावात मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. पण ते पाकिस्तानला विरोध करतात व भारताला आपला देश मानतात. सीमा भागात अशी परिस्थिती सगळीकडेच आहे. काही लोक ड्रग्सच्या व्यापारासाठी दहशतवादात सामील होतात. त्यांना नेस्तनाबूत केले पाहिजे व भारताबरोबर प्रामाणिकपणे काम करणार्या लोकांना जबरदस्त ताकद दिली पाहिजे. त्यातूनाच आपण लोकांची मने आणि हृदय जिंकू शकतो. कुठल्या निरपराध माणसाला सुळावर लटकवून काहीच साध्य करू शकत नाही. स्वत:च्या गल्लीमध्ये कुत्रा राजा असतो,बाहेर गेला की तो उंदीर बनतो. म्हणून धर्माच्या नावावर द्वेषभावना निर्माण करणारे लोक पाकिस्तानला मदत करत आहेत. कारण पाकिस्तानला धार्मिक द्वेष वाढवायचा आहे. माझ्या सर्व देशबांधवांना विनंती आहे की धर्मावर आणि जातीवर द्वेष नष्ट करा व भारतीय नागरिक म्हणून देश बलवान करा.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.