नेत्यांची किती मुले सैन्यात?
क्रांती ही वर्तमानाला आणि भविष्याला जोडणारी घटना असते. क्रांतीतून व्यवस्था परिवर्तन होऊ शकते. पण प्रतिक्रांती झाली तर जैसे थे होते. जसे तुनिसिया आणि इजिप्तमध्ये अमेरिकन हुकुमशाह विरुद्ध लोकांनी क्रांती केली पण लगेच प्रतिक्रांती झाली व पुन्हा अमेरिकेने आपले हुकुमशाह बसवले. आजची जागतिक व्यवस्था ही अमेरिकन भांडवलशाही चालवते. अमेरिका निर्मित जागतिक बँक पुर्ण जगाच्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवते. १९९१ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था स्वतंत्र होती. पण राजीव गांधींची हत्या झाली आणि भारतात मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले. ते जागतिक बँकेतून सरळ भारताचे अर्थमंत्री झाले. भारताला त्यावेळी सोने विकावे लागले होते. मी सैन्यातून बाहेर येऊन त्याच वेळी खासदार झालो. अमेरिकेने शीत युद्द जिंकले आणि त्यांना टक्कर देणारा सोविएत संघ विरघळला व त्याचे अनेक तुकडे झाले. राजीव गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेस पुर्ण बदलली. नरसिंहराव प्रधानमंत्री आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले व भारत जागतिक बँकेच्या नियंत्रणाखाली आला. तेंव्हा पासून भारत गुलाम होण्याची प्रक्रिया सुरु झाली. आर्थिक निर्णय जागतिक बँक घेणार आणि त्याची अंमलबजावणी मनमोहन सिंग घेणार हे समीकरण प्रस्थापित झाले.
ह्यालाच आपण आजची व्यवस्था म्हणतो. सुरुवातीला ह्या निर्णयाला कॉंग्रेस सकट अनेक खासदारांनी विरोध केला. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ह्या तीन स्तंभावर भारताचे अर्थकारण आणि राजकारण उभे राहिले. ह्याला प्रचंड विरोध पाहता भाजप आणि कॉंग्रेसने षडयंत्र रचून बाबरी मस्जिद पाडली व प्रचंड रक्तपात झाला. त्यामुळे लोकांचे लक्ष हिंदू मुस्लिम दंगलीत लागले. त्यापाठीमागे जागतिकीकरणाचा अजेंडा भारतात बेमालूमपणे लागू झाला. आता हे बदलायचे असेल तर अमुलाग्र बदल घडविण्याची आवशकता आहे. परिवर्तन म्हणजे सरकार बदलणे नव्हे तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था उध्वस्त करून तिच्या जागी नवीन व्यवस्था उभी करणे आहे. म्हणजेच भांडवलदारी/ जागतिक बँक WTO नियंत्रित व्यवस्था उध्वस्त करून शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कष्टकऱ्यांची व्यवस्था स्थापन करणे. राजकीय बदल निवडणुकीद्वारे होतो. पण व्यवस्था तीच राहते. फडणवीस आणि अजित पवार सरकारी विमानाने महाराष्ट्रात लग्न समारंभात मजा मारताना दिसतात. दुसरीकडे सिंचन घोटाळ्यात चौकशी करून अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याची भाषा विसरून जाताना जाणीव होत आहे. मोदी अन शरद पवार अनेकदा एकत्र दिसतात. एकमेकांचे कौतुक करतात. राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर भाजप सरकार उभे आहे. दुसरीकडे शिवसेना डरकाळ्या फोडत राहते. कॉंग्रेस तर बघ्याची भूमिका घेते. युपीये सापनाथ आणि एनडीए नागनाथ जनतेला डसण्याचे काम अविरतपणे करत आहेत. जय किसान आणि जय जवान मरतच आहेत. ही आजची व्यवस्था आहे. कामगारांचे पगार वाढण्याऐवजी कमी होतात आणि महागाई वाढतच जाते. त्यात GST हे लोकांना मारण्याचे नवीन अस्त्र बनते.
सापनाथ किंवा नागनाथ सत्तेवर आले तर काहीच फरक पडत नाही. कारण ह्यांना चालवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. एक आला आणि दुसरा गेला तर ह्या जागतिक शोषणकारी व्यवस्था कायम आहेत. राजकीय नेते मनमोहन सिंग/ शरद पवार असले का मोदी/ गडकरी असले तरी काही फरक पडत नाही. शरद पवारांनी मोठ्या गाजावाजात स्वामिनाथन आयोग २००६ ला जाहीर केला, पण लागू करत नाहीत आणि आता मराठा क्रांती मोर्चाला फसवायला स्वामिनाथन आयोग लागू करा म्हणून मगरीचे अश्रू ढाळतात. मोदी स्वच्छता मोहीम जाहीर करतात. शरद पवार सहकुटुंब झाडू मारताना ५ मिनिट दिसतात. दोघे परत झाडू मारताना दिसत नाहीत. शहरात कचरा वाढतच जातो. नितीन गडकरी किंवा फडणविस यांना स्वच्छ भारताचे काहींच पडलेले दिसत नाहीत. गडकरी खड्डे बहादूर बुलेट रस्ते बनवत आहेत आणि फडणवीस अमीर खान, अमिताभ बच्चन बरोबर फिरण्यात मग्न आहेत.
ह्यामुळेच मी २०१४ च्या निवडणुकीच्या आधी ‘फोकनाड मोदी’ असा लेख ह्याच सदरात लिहिला होता. अच्छे दिन यवतमाळच्या फवारणीमध्ये शहीद झालेल्या २८ शेतकऱ्यांच्या वाटेला आले हे दिसतेच आहे. शहीद म्हणतो कारण मोदी /पवार मायबाप सरकारच्या राष्ट्रीय धोरणातून हे शहीद झाले. सरकार आदेश देते त्यावर अंमल करत असताना कोणाचे प्राण गेले तर शहीद असे संबोधले जाते. बीटी कापूस कोणी भारतात आणला. तर ह्या दोघांनी आणला. आज शेतकरी कापूस जाळून टाकत आहेत. कारण बीटी कापसाला किड लागली. आता मोन्सॅन्टो ह्या बहुराष्ट्रीय उद्योग समुहाने हे बियाणे भारतात आणताना हमी दिली होती कि बीटीला कधीच किटक लागणार नाही. मग मोदीसाहेब, मोन्सॅन्टोला भारतातून हद्दपार का करत नाही. शरद पवार/ मनमोहन सिंगने मोन्सॅन्टोचा प्रचंड फायदा करून दिला. भारतभर त्यांची औषधे / कीटकनाशके, बियाणे प्रसारित केली आणि शेतकऱ्यांच्या व्यवस्थेचा कणाच मोडून काढला. ह्या बहुराष्ट्रीय उद्योगसमुहाचे व तश्याच अनेक बहुराष्ट्रीय उद्योगसमूहानी भारतात आपली दुकाने मांडली आहेत आणि हे देशाला लुटत आहेत.
हे मनमोहन सिंगचे पाप आधी मग मोदी-वाजपेयीचे पाप आहे. कारण आमच्या विरोधाला न जुमानता मनमोहन सिंगनी WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटना बनवली. आणि खुल्या व्यापाराची / जागतिकीकरणाची सुरुवात केली. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी मस्जिद / मंदिरचे राजकारण सुरु केले. हिंदू मुस्लीम दंगली घडवून देशाचे आणि जनतेचे लक्ष वळवून ह्या व्यवस्थेने भारतात नवीन इस्ट इंडिया कंपनीला विकून टाकला. त्यात अनेक शेतकरी संघटनेने आगीत तेल ओतले. खुल्या अर्थव्यवस्थेला मदत केली. आता निर्णय होतात WTO मध्ये आणि त्याचा कायदा करतात आपले खासदार. मरतो शेतकरी आणि कामगार.
अमेरिकन मालकीच्या जागतिक बँकेने म्हणूनच भारताला धंदा करायच्या सुलभतेत १३० वरून १०० वर आणले. कारण भारत सरकारच्या धोरणात, मोन्सॅन्टोचे हित पहिले येते आणि शेतकरी कामगारांचे हित कधीच येत नाही. गेल्या २ वर्षात भारतात संपत्तीचा संचय प्रचंड प्रमाणात झाला; पण तो अतिश्रीमंतांच्या खिशात गेला. गरीबाकडे तुरळक आला. नुकतेच मोदी सरकार विरुद्ध कामगार संघटनांनी दिल्लीत अभूतपूर्व मोर्चा काढला. कामगारांना कायम नेमण्याची पद्धतच नष्ट झाली. उद्योगसम्राट कामगाराना केव्हाही काढू शकतात. सर्व कंत्राटी कामगार आहेत. त्यांना पगार देखील कुत्र्याला तुकडे फेकल्यासारखे देतात. किमान वेतन हे रु.८४०० असेल. केजरीवाल सरकार रु.१५,००० देते. मग महाराष्ट्राच्या कामगारांना कमी का? कामगार तर बहुसंख्य हिंदूच आहे. शेतकरी हिंदूच आहे. मग हिंद्त्वाच्या तुमच्या फोकनाडमध्ये ह्यांचे हित का दिसत नाही. हिंदुना तुम्ही आत्महत्या करायला लावता. हिंदुत्वाचा मुखवटा लावून तुम्ही हिंदूंच्या कत्तली करत आहात. त्या पाठीमागे तुम्ही अमेरिकेला खुश करण्यासाठी मोन्सॅन्टोला प्रचंड श्रीमंत करत आहात. हिंदूंच्या टाळूवरचे लोणी खात आहात. गोऱ्या चामडीचे गुलाम तुम्ही काय भारताचे संरक्षण करणार.
सर्जीकल स्ट्राईक करून फोकनाड मारले. आता पाक ने १०० सर्जिकल स्ट्राईक केले त्यात आमचे हिंदू जवान मारले गेले. तुम्ही काय केले? कारण अमेरिका तुम्हाला पाकवर हल्ला करु देत नाही. संघवाल्याना आणि भाजप कॉंग्रेसवाल्यांना माझा प्रश्न आहे. तुमची किती लोकांची मुले सैन्यात आहेत? बहुतांश अमेरिकन नेते सैन्यात काम करतात. ट्रम्पचे अनेक मंत्री सैन्यातील आहेत. सरकारी नोकरी सैन्यात काम केल्यानंतरच मिळते. माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे १५ वर्ष आमदार होते. मी एकुलता एक मलगा असताना मला सैन्यात जाताना विरोध केला नाही. पण मी सैन्यात असताना एकाही नेत्याचा मुलगा सैन्यात दिसला नाही. ना कोणी टाटा-बिर्ला, अंबानी,अडाणीचा मुलगा सैन्यात आला. इंग्लंडमध्ये तर राजा राणीची मुले सैन्यात असतात. ह्या वरुन राष्ट्राच्या प्रती नेत्यांची निष्ठा दिसते. उद्योगपती तर फायद्यासाठी कुणालाही विकतील. मग माझ्या देशबांधवानो आपल्यालाच आपला देश वाचवावा लागेल. त्यासाठी खंबीर नेतृत्व आणि एकसंघ भारतीय समाज बनवावा लागेल. हे आजचे खरे आव्हान आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com मोबा. नं. ९९८७७१४९२९ |