कालच मी बुलढाणा जिल्ह्यात शहीद राजपूत आणि राठोड कुटुंबियांना भेटून आलो. काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या बुलडाणा जिल्ह्याचे मलकापूर तालुक्यातील सुपुत्र व लोणार तालुक्यातील चोर पांग्रा येथील वीर जवान यांच्या समाधी स्थळी जाऊन मी आदरांजली वाहिली व त्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली व कुटुंबियांना धीर दिला. युद्धापेक्षा भयानक वेदना शहिदांच्या कुटुंबियांना भेट देताना होते. मुलं आपल्या वडिलांना कधीच बघू शकणार नाहीत. त्या विरपत्नीला आपल्या पतीचा सहवास कधीच लाभणार नाही. ही जाणीव दरवेळी शहिदांच्या कुटुंबियांना भेट देत असताना होते. आपल्या कुटुंबावर ही असा प्रसंग येवू शकतो हे माहीत असून देखील आपले जवान लढतात. हेच केवढे मोठे धाडस आहे. त्यागाच्या या सर्वोच्च पातळीची सरकारला जाणीव असावी आणि अनेक वर्ष चाललेल्या या काश्मिरी संघर्षाला पूर्ण विराम देण्यासाठी खंबीर पाऊले उचलावीत अन्यथा राष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
पुलवामा मध्ये एका दहशतवाद्याने ४४ जवानांची हत्या केली. देश संतापला. रक्ताच्या बदल्यात रक्त मागू लागला. ‘पाकिस्तानला नष्ट करा’ असे आक्रमक धोरण स्विकारले. तिकडे मोदी, रेल्वेचे उद्दघाटन करत, पांढरकवडा येथे महिला मेळावा, अशी अनेक उद्दघाटन करत फिरत आहेत. पक्षाचा प्रचार जोराने करत आहेत. टी.व्ही. वर धमक्या देत फिरत आहेत. फोकनाड परंपरा चालवत आहेत. त्यांना जाणीव नाही कि राष्ट्रप्रेम हे भाषण करून दिसत नाही, कृती करून दिसते. ज्या सैनिकांनी आपले प्राण ह्या देशासाठी दिले, त्यांनी सर्वतोपरी त्याग केला. त्यागावर आधारित राष्ट्रप्रेम उभे राहते. उंच पहाडात राहताना, अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देताना, बर्फाचेकडे अंगावर घेत मरताना काय यातना होतात याची दिल्लीच्या वातानुकुलीत वातावरणात बसून कल्पना येत नसते. लोखंडात आणि रक्तात जे खेळतात त्यांनाच ह्याची जाणीव होऊ शकते .
२०१४ नंतर एक विचित्र सरकार काश्मिरमध्ये स्थापन करण्यात आले. स्वत:ला राष्ट्रप्रेमी म्हणणारे भाजप आणि दहशवाद्यांच्या मदतीने निवडून आलेले मुफ्ती-मेहेबुबा सरकार ह्यांची आघाडी झाली आणि काश्मिरचे वाटोळे झाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेवटी भाजप काश्मिर सरकारमधून बाहेर आले. पण ३ वर्षांत काश्मिर बरबाद केला. २०१४ ला काश्मिरमध्ये पूर्ण शांतता होती. मोदी मुफ्ती सरकार स्थापन झाल्यावर प्रचंड दहशतवाद सुरु झाला. त्या राजकारणामुळेच पुलवामा मध्ये ४४ जवान मारले गेले. मी एक सैनिक होतो. प्रत्यक्ष काश्मिरमध्ये राहणे आणि दुरून अनुमान लावणे ह्यात मोठा फरक आहे. काश्मिर धोरणाचे सर्वात मोठे अपयश आहे कि सैनिकांना त्या धोरणापासून दूर ठेवणे. त्यामुळे राजकीय निर्णय हे बेजबाबदारपणे घेण्यात आले. मग ते पंडित नेहरू असो व आता मोदींचे आत्मघातकी धोरण असो. सर्व पक्षांनी सैनिकांना संरक्षण खात्यापासून दूर ठेवले आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा सल्ला देखील घेत नाहीत. भाजपच्या खासदारात माजी सैन्यदल प्रमुख जनरल व्ही.के.सिंघ आहेत. पण त्यांना राज्यमंत्री करून खालच्या पदावर ठेवून अडगळीत टाकले आहे. खासदार जनरल खंडुरी आहेत. ते उत्तरखंडचे मुख्यमंत्री होते. भ्रष्टाचारी नव्हते. म्हणून त्यांना काढून टाकण्यात आले. आता तर मंत्री देखील केले नाही.
मला एकदा नरसिंह रावने विचारले होते कि तुला कुठले मंत्रीपद पाहिजे. मी म्हटले कि, सध्या मी नवीन आहे म्हणून मला मंत्रिपद नको, पण देणारच असाल तर डीफेन्स द्या. त्यावर ते म्हणाले, “आताच तू सैन्यदलातून आला आहेस. तर संरक्षण राज्यमंत्र्याचे पद ठीक राहणार नाही”. सर्व पक्षांनी असाच सैनिकांचा अपमान केला आहे. मोदीने तर अपमान करण्यात विक्रम गाठला आहे. सेनादल प्रमुखालाच नगण्य असे राज्यमंत्री पद देऊन कोनाड्यात बसविले आहे. काश्मिरमध्ये अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे. त्यांना मोदी ‘काश्मिर’ हा शब्द सुद्धा उच्चारू देत नाही. त्याउलट अमेरिकेत अर्धे मंत्री आणि अधिकारी सैन्यात नोकरी केलेले असतात. म्हणूनच इतक्या धाडसाने अमेरिका जगभर आपले प्रभुत्व ठेवते. जर देश बलवान करायचा असेल तर रक्ताशी आणि लोखंडाशी खेळावेच लागते. फोकनाड मारून कधी देश प्रगती करू शकत नाही. जसे संघ प्रमुख भागवत वल्गना करतात कि, त्यांचे सैनिक ३ दिवसात युद्धाला तयार करतील. म्हणजे भारतीय सैनिक अहोरात्र प्रशिक्षण करतो तो मूर्ख ठरतो. साप खाल्यानंतर उलटी करत करत ४० कि.मी. दौड करणारे आम्ही मूर्ख ठरतो. ह्या संघ परिवारातील लोकांना कधीही काश्मिरमध्ये बघितले नाही. बंदूकीचा आवाज ऐकला तर धूम पळत सुटतील. हिंमत असेल तर लाल चौकात जाऊन भागवत साहेब तिरंगा फडकावून दाखवा. बरोबर प्रणव मुखर्जीना घ्या. सैन्यदलाचे ते सरसेनापती होते आणि कॉग्रेसमधील तुमचे गुप्तहेर होते.
गल्लीतील दादा आपल्या गल्लीत शेर असतो. भाजप आणि संघपरिवाराचे असेच आहे. मोठ मोठे फोकनाड मारायचे. मोदी काश्मिर प्रश्न सोडवणार, पाकिस्तानला धडा शिकवणार असे गरजायचे आणि शपथविधीलाच नवाज शरीफला बोलवायचे. वाढदिवसाला जाऊन मिठ्या मारायच्या. काश्मिरचा लढा धार्मिक नाही. त्याला पाकिस्तान सातत्याने धार्मिक करायचा प्रयत्न करत आहे. हिंदुत्व प्रेमी भाजप सरकार काश्मिरवर राज्य करू लागले म्हणून आतंकवादाचा कहर झाला. २६ जानेवारीला ज्या शहीद वाणीला तुम्ही देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘अशोक चक्र’ दिले त्याचा व शहीद औरंजेबचा काश्मिर आहे. बहुतेक काश्मिरी मुस्लिम दहशतवाद्यांना विरोध करतात. पाक बरोबर युद्ध करायचे देखील असेल, तर स्थानिक लोकांना आपल्या बरोबर घेतले पाहिजे. नाहीतर भारतीय सैन्य पुढून पाक सैन्य व मागून दहशतवादी ह्या कात्रीत सापडेल.
शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना काश्मिरमध्ये मला बरीच कामगिरी करण्याची संधी मिळाली. त्यावेळी काश्मिरचे आजचे राज्यपाल एन.एन.वोरा गृहसचीव होते. ह्या दोघांमुळे दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे धोरण बनले. मी इखवान दहशतवादी गटांच्या नेत्यांना घेवून त्यांना भेटलो आणि २५०० काश्मिरी दहशतवादी लोकांनी आत्मसमर्पण केले. त्यांना हत्यारे देण्यात आली. पण नंतर त्यांची कत्तल करण्यात येत होती. म्हणून मी आग्रह धरला कि त्यांना सैन्यात घ्या. अखेर मंजुरी मिळाली. २००३ पासून ८ पलटणी तयार करण्याचे काम सुरु झाले. प्रत्येक पलटणीत १००० काश्मिरी मुस्लिम सैनिक घेण्यात आले. असे ८००० सैनिकांची फौज २००६ पर्यंत उभी करण्यात आली आणि काश्मिर मधील दहशतवाद संपुष्टात आला. हे केवळ सैन्याचे काम होते. दहशतवाद्यांना काश्मिरच्या गावात प्रवेश बंद केला.
१ मार्च २०१५ ला मोदीनी मुफ्ती मोहम्मद सय्येदला मिठी मारली आणि मुख्यमंत्री बनवला. पहिल्याच सभेत मोदी समोर मुफ्तीनी निवडणूक शांततापूर्ण वातावरणात होऊ दिल्याबद्दल पाकिस्तानचे आणि दहशतवाद्यांचे आभार मानले. मोदी गप्प बसले. ह्या दरम्यान सैन्याला highway पूलवामा सारख्या मुख्य ठिकाणावरून काढण्यात आले. त्याजागी BSF किंवा CRPF ला लावण्यात आले. दगड फेक वाढत गेली. सैनिकी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पण भाजप मेहबूबा सरकारनी काहींच कारवाई केली नाही. उलट दगडफेक करणाऱ्यांना माफ केले. कणाहीन राजकारणाला नेहमीच अपयश आले आहे. सैन्यांनी काश्मिरमध्ये शांती आणली. तुम्ही फोकनाड मारले. सैन्याचा घात केला. त्यांना लढायला लावून स्वत: सर्व पक्ष सुरक्षित आहेत. तुमचे काहींच गेले नाही, मेली ती फक्त जनता आणि शहीद झाले ते फक्त सैनिक. त्या वीरमाता व पत्नींचा आक्रोश शहिदांना श्रद्धांजली देवून थांबवता येत नाही. त्यांच्या अश्रूंची किंमत तुम्हाला द्यावी लागेल. औरंगझेबसारख्या शहिदांनी, माझ्या देश बांधवानो तुम्हाला संदेश दिला आहे. तुम्ही एक व्हा आणि सत्तेच्या राजकारणासाठी देशाला विकणाऱ्या आणि समाजाला फोडणाऱ्या ह्या राजकीय पक्षांना कुठेतरी नेऊन गाडा.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९