व्यवस्था परिवर्तन (भाग १) – राजा कोण?_२३.७.२०२०

२१ व्या शतकात काय होत आहे? एक जबरदस्त बॉम्ब होऊन सर्व जग हादरून गेले . राजकारण, समाजकारण, अर्थकारण होऊन सगळेच उद्ध्वस्त होऊन त्यांचे तुकडे तुकडे झाले. जगच बदलले  राजकारणाची भाषाच change वर आधारित झाली. कशाचा बदल?कशाचा change? २०वे शतक अस्त पावत चालले आणि २१वे शतक उदयास आले तेव्हापासून जुने नष्ट झाले पण नविन काय आले? हे मानवाला समजलेच नाही. आतादेखील या बदलाचा भेद आपण करू शकलो नाही. कोरोना आला आणि आपण घरात दडून बसलो. काम करणे बंद झाले. शाळा बंद, कॉलेज बंद,ट्रेन बंद,रस्ते बंद. एरव्ही जगात कुठेही कधीही मुक्तपणे फिरत असणारा मानव आता आपल्या घरात, जास्तीत जास्त आपल्या गावात जेरबंद झाला.ही लेखमाला व्यवस्था परिवर्तनाची आहे. माझ्या समजुतीप्रमाणे सर्वच पक्ष सारखेच काम करत आहेत. कुणी कुणाला शिव्या दिल्यातरी सत्ता आपला खेळ खेळत चालली आहे आणि आपण सर्व तिच्यामागे फरफटत चाललो आहोत. शेवटी राज्य कोण करत आहे? आजचा राजा कोण? हे कळेनासे झाले आहे. हीलेखमाला ते उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून कोणी राग मानू नये.

१ जानेवारी २००० ला भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंघ यांनी दहशतवाद्यासमोर गुडघे  टेकले. नेपाळहून उडालेले इंडियन ऐअरलाईन्सचे  विमान अपहरण करण्यात आले. ते थोड्या वेळासाठी अमृतसर  विमानतळावर उतरले. भारतीय कमांडोंनी तिथेच ते विमान ताब्यात घेण्याचे ठरविले. पण सरकारने परवानगी दिली नाही. विमान उडाले, पाकिस्तानने देखील पाकमध्ये उतरायला परवानगी दिली नाही. शेवटी ते अफगाणिस्तानमध्ये कंधार येथे उतरवण्यात आले. त्यावेळेस तिथे तालिबान सरकार राज्य करत होते. आपला त्यांच्याशी संबंधच नव्हता. मग कोण बोलणार? दोन देशात वार्तालाप नव्हता. वर युनो पण तालिबान सरकारशी बोलत नव्हता. मग गुप्तहेर खात्यांनी माफियाला मध्यस्थ केले आणि तालिबान सरकारशी बोलणे सुरु केले. येथे माफिया आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वाचा दुवा ठरला. तालिबान सरकारने भारत सरकारला आश्वासन दिले कि विमानाच्या आतील लोकांना काही इजा होणार नाही. भारत सरकारने तालिबान सरकारला मान्यता द्यावी. पण भारत सरकारने ते मान्य केले नाही. कारण सरकार भावनेने काम करत होते. अमेरिकेच्या आदेशावर काम करत होते. म्हणून तालिबान बरोबर बोलायचे नाही. खरे तर तालिबानभारताविरुद्ध काहीच करत  नव्हता . पठाण मुसलमान जरी असला तरी मुळात भारत प्रेमी आहे. पण ही समज आपल्याला नाही. मुळात तालिबानची मदत घेऊन त्यावेळी जर दहशतवाद्यांना मारून टाकले असते तर नाना तर्‍हेचा जो दहशतवाद्यांचा कहर झाला तो झाला नसता.

भारतीय सैन्याचे आणि गुप्तहेर खात्याचे धोरण होते NO NEGOTIATION दहशतवाद्यांबरोबर अपहरण संबंधात बोलणी करायची नाही. म्हणून अमृतसर येथेच विमान अडवले असते तर दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकावे लागले नसते. मला माहित आहे कि वाजपेयींना हे करायचे नव्हते. पण त्यांनी केले व नवीन शतकाच्या सुरुवातीलाच भारत झुकला. हे कुणामुळे झाले? हे सांगणे कठीण आहे. पण सरकारचा निर्णय फिरवू शकणारी कोणती तरी मोठी ताकद आहे. भारत सरकारने दहशतवाद्यांची मागणी मान्य केली व अझर मासूद सह ३ दहशदवाद्यांना सोडून दिले. ते ३ दहशतवादी आजपर्यंत भारताचे रक्त पीत आहेत. अझर मासुदने  भारताला नष्ट करायची  शपथ घेतली होती. त्याच्या जैश-ए-मुहम्मद संघटनेने संसदेवर हल्ला केला आणि अनेक भारतीय सैनिकांचे आणि निरपराध लोकांचे रक्त सांडले. हे काय चालले आहे? दहशदवाद्यांसमोर गुढगे टेकणाऱ्यामुळे  भारताला पुढे अनेक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. कारण सरकारमध्ये दम नाही. १९९० नंतर कोणत्याच सरकारने दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी राजकीय  इच्छाशक्ति दाखवली नाही.  कायद्यामध्ये दम नाही.

१९८०दशकाने जगाला निर्णायकरित्या बदलले, पण ते कुणाला कळलेच नाही. अफगाणिस्तानच्या कम्युनिस्ट सरकारला मदत करण्यासाठी त्यावेळच्या सोविएत संघाने अफगाणिस्तानमध्ये आपले सैन्य पाठविले. लगेच अमेरिकेने त्याला शह देण्यासाठी पाकिस्तानमध्ये दहशतवादी टोळ्या गोळा केल्या. पाकिस्तान, अमेरिका आणि सौदीअरेबिया यांनी सोविएत विरुद्ध जिहाद पुकारला.  त्यात पाकिस्तानचा प्रचंड फायदा झाला. दहशतवादी टोळ्या ओसामा बिन लादेन सकट ज्या निर्माण झाल्या त्यातच भारताविरुद्ध अनेक टोळ्या पाकिस्तानने त्याच पैशात उभ्या केल्या. भारताविरुद्ध, खलिस्तान, काश्मिर, लिट्टे, आसाम येथे प्रचंड संघर्ष निर्माण झाला. पाकिस्तानने त्याच दरम्यान अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतामधील माफिया टोळ्यांना एकत्र केले. दाऊदला माफियचा शहनशहा  बनवलातेव्हापासूनआजपर्यंत दाऊद ह्या भागाचा सम्राट आहे. १९८० लाच जगभर माफिया शक्तिशाली बनत गेला. कोलंबियाचा पाब्लो एस्कोबार, मेक्सिकोचा एल चापो, बर्माचा खूनशाह माफिया डॉन झाले. त्यांनी ड्रग्स तस्करीतून प्रचंड पैसा जमा केला.  जगातील पहिल्या १० श्रीमंत लोकात त्यांची गणना होऊ लागली. त्यांच्या सरकारच्या मदतीनेनव्हे तर सरकार ह्यांच्या तालावर चालू लागले. लोकशाहीचा मुखवटा परिधान केलेले माफिया राज्य बहुतेक देशात सुरु झाले व लोकशाही उद्ध्वस्त झाली.  ही आजची खरी स्थिती आहे. ह्यावर विस्ताराने मांडणी करण्यात येईल.

आजकाल गुन्हेगार राज्यकर्ते आहेत, मजा मारत आहेत. सरकारे कमकुवत झाली आहेत कारण सरकारमध्ये दम नाही. कायद्यामध्ये दम नाही. दाऊद इब्राहीम जर आज आला आणि सरकारसमोर शरण गेला तर त्याला काही होणार नाही. त्याच्या  विरोधात साक्ष कोण देणार?भाजप सरकार असो कि कॉंग्रेस असो. सरकारमध्ये दम नाही. यावस्तुस्थितीला आपण सामोरे जात नाही. शहामृगासारखे मातीत डोक लपवून सगळे चांगले चालले आहे म्हणतो. असे अनेक हल्ले जगात होत आहेत आणि सरकारे त्यावर काहीच करत नाहीत. उलट संघटीत गुन्हेगारांशी तडजोड करतात. १९८० पासून ५० वर्ष दाऊद अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतावर राज्य करत आहे. पण त्याला कुणीच काही करू शकले नाही. दुसरीकडे अंबानी आहेच. ह्या दोघात काय साम्य आहे. हे दोघे भारत चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना हे हिणवत राहतात. राजकीय नेत्यांना हे कुत्रे समजतात व राजकीय नेते चोर आहेत असे जनता सुद्धा म्हणते.

जगात सगळ्या चांगल्या लोकांना राजकारणातून हाकलून देण्यात आले आहे आणि लोकशाहीचा ह्रास होत  गेला आहे. शेवटी आजची व्यवस्था कोण चालवते? हा आजचा मुख्य प्रश्न आहे पण त्याचे उत्तर शोधायला समाज आणि सरकार बघत नाही. ह्याचे उत्तर वोरा समितीने अपघाताने दिले. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे काम म्हणजे वोरा समिती आहे. ह्या समितीने स्पष्ट म्हटले कि आज माफिया, सरकार आणि सरकारी कर्मचारी एक समांतर सरकार चालवत आहे. ही समिती झालीच नसती. सर्व गुप्तहेर पोलीस संघटना घेऊन भारतात पहिल्यांदाच अशी समिती झाली. raw या गुप्तहेर संघटनेने आपले अस्तित्व अधिकृत केले. अशी समिती कधी झाली नव्हती व कधी होणार नाही. मुंबई बॉम्ब हल्ल्यानंतर मी १०० खासदारांची सही घेऊन राजकारणी, माफिया, सरकारी अधिकारी आणि उद्योगपतीतील संबंध जाहीर करण्यासाठी ह्या समितीची मागणी केली. बर्‍याच प्रमुख राजकीय नेत्यांनी ह्याला विरोध केला.पण त्यावेळी राजकारणात जसे बदमाश नेते होते तसे चांगले नेते देखील देशासाठी लढत होते.  शंकरराव चव्हाण आणि राजेश पायलट गृह खाते सांभाळत होते म्हणून माझ्या प्रयत्नांना यश आले. समिती झाली. त्यावेळी सर्व खात्यांच्या प्रमुखांनी म्हटले कि आमच्या अहवालावर कोणीच काहीच करणार नाहीत. फक्त आम्ही बोलून वाईट होऊ. पण मी अनेकांना भेटलो त्यांना विश्वास दिला कि आपण काळजी करू नका आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. त्यावेळी मला माहित नव्हते कि आमच्या पाठीशी कोणीच उभे राहणार नाही.

वोरा समिती अहवाल आला. कुणालाही न कळवता राजेश पायलटना मी सांगितले कि प्रधानमंत्री हा अहवाल लोकसभेत येऊ देणारनाहीत. तुम्ही जाऊन लोकसभेत मांडा. “सुधीर ये बगावत समझी जायेगी”. मी म्हटले “देश के लिये कुछ भी करना पडेगा” तोपर्यंत मी खासदारांमध्ये बराच प्रिय झालो होतो. राजेश पायलटने वाचायला म्हणून तो अहवाल गृह सचिव वोराकडून घेतला आणि लोकसभेत मांडला. वोरांनी पूर्ण अहवाल पायलट यांना दिला नव्हता. त्यात सर्व माफियांशीसंबंध असलेल्या लोकांची नावे होती. म्हणून अर्धाच अहवाल लोकसभेत जाहीर करण्यात आला. तो एक अॅटमबॉम्ब होता. बाबरी मस्जिद कुणी आणि का पाडली? मुंबई दंगल का झाली?हे सर्वच त्यात होते. आजचे अनेक नेते तुरुंगात गेले असते.मी अनेक पक्षाच्या नेत्यांना हा अहवाल उजेडात आणायला सांगितला, पण गेली २५ वर्ष तो अहवाल गाडला गेला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांना हा अहवाल गाडावे असे का वाटते? कारण प्रत्येकाचा कोणी न कुणी भ्रष्ट माणूस त्यात आहे.आजच्या राजकीय नेत्यांचे हेच हाल आहेत. मग देशाचा वाली कोण?                 

क्रमश …

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS