जेट एयरवेजला टाळे लागले. लाखो लोक बेकार झाले. जेटचा मालक गोयल कुठून आला आणि एवढी मोठी विमानसेवा केव्हा उभी केली हे कुणाला कळलेच नाही. पैसा कुठून आला? कंपनी कुठे बनवली? त्याचे भागीदार कोण आहेत? खरे मालक कोण आहेत? हे कुणालाच माहीत नाही. ह्याची साधी चौकशी सुद्धा भारत सरकार करत नाही. ही पूर्णपणे परदेशी कंपनी आहे. कुणालाही परदेशातून भारतात येऊ दिले जाते आणि लाल गालिच्यावर स्वागत केले जाते. ही कंपनी पाकिस्तानच्या मालकीची आहे कि दहशतवाद्यांच्या मालकीची आहे हे कोणीच बघत नाही. म्हणूनच कोलगेट, लक्स साबण बनवणार्या युनिलिवर कंपन्यामध्ये अमेरिकन हेरांची पेरणी केली आहे हे सरकारला कळत नाही. गोरी बाई बघितली कि नेते सगळे विसरून जातात. जसे एनरॉन कंपनी शरद पवारने भारतात आणली. शिवसेना भाजपने१९९५ च्या निवडणुकीत एनरॉन अरबी समुद्रात बुडवू ह्या नार्यावर निवडणूक जिंकली. पहिले युती शासन स्थापन झाले. रेबेक्का मार्क ही सुंदर गोरीबाई सर्वांना भेटली आणि शिवसेना भाजप सरकारने एनरॉनला आपल्या डोक्यावर उचलून घेतले. परिणाम असा झाला कि आजपर्यंत महाराष्ट्र विजेसाठी तहानलेला आहे. सर्व एनरॉनचे मालक अमेरिकेत तुरुंगात आहेत. कारण ती गुन्हेगारांची कंपनी आहे हे सिद्ध झाले. परदेशातील कंपन्या कुणाच्या आहेत? त्यामुळे भारताला काय हानी होईल हे न बघता भारतात आणल्या जातात. त्यांना पुर्ण सुविधा दिल्या जातात. ह्या कंपन्या, जल, जमीन, वीज घेऊन बँकेकडून कर्ज घेतात. मग बुडवतात आणि पळून जातात. त्यात मालक प्रचंड पैसा कमावतात. भारत कंगाल होतो, नागरिक बेकार होतात आणि देशाचे प्रचंड नुकसान होते. नोकर्या काही वाढत नाहीत.
मोदीने काळापैसा भारतात परत आणण्याच्या वल्गना केल्यानंतर आंतरराष्ट्रीय चौकशीमध्ये २००० लोकांची नावे मोदींच्या टेबलावर आली. ज्यांनी भारतातला पैसा पळवून परदेशी बँकामध्ये लपवून ठेवला आहे. पण भारत सरकार कुठलीही कारवाई करत नाही. मनमोहन सिंघ आणि मोदीने परदेशी कंपन्यांसाठी भारताचे दार सताड उघडले. FDI, मेक इन इंडिया हे कार्यक्रम परदेशी भांडवलदाराना देऊन ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे देश लुटारुंच्या ताब्यात दिला. अशी अनेक उदाहरणे आहेत. जसे जेट विमान सेवा कंपनी कुठल्या देशातील आहे? ह्याचे उत्तर मिळणे कठीण आहे. कुठेतरी करमुक्त ‘केमेन द्वीप समूहात’ बनली आहे. तिचा मालक कोण आहे ते कुणालाच माहीत नाही. अफवा आहे कि मालक दाऊद इब्राहीम आणि काही मंत्री आहेत. गोयल हा बेनामी मालक आहे. नुकतेच मोदी साहेबांनी निवडणूक प्रचारसभेत म्हटले कि राष्ट्रवादीच्या नेत्यांना घाम फुटला आहे कारण तिहार तुरुंगातील एक कैदी भांडाफोड करणार आहे. प्रफुल पटेल ह्यांच्याकडे उंगली निदर्शन करताना मोदी साहेबांनी सांगितले कि पटेल ह्यांच्या कार्यकाळात, एअर इंडिया ह्या सरकारी विमान कंपनीचे फायद्यातील हवाई रस्ते जेटला देण्यात आले. सरकारी विमानसेवेला नष्ट करून खाजगी विमानसेवा उभारल्या गेल्या. ह्यालाच खाजगीकरण म्हणतात. १९९१ ला मनमोहन सिंगने नारा दिला कि धंदा करणे हा सरकारचा धंदा नाही. तेच २०१४ नंतर मोदीने धोरण राबिवले. म्हणून अनेक वर्षाच्या मेहनतीने आणि जनतेच्या पैशांनी बनलेल्या प्रचंड मोठ्या कंपन्या कवडीमोल भावात विकून टाकण्यात येत आहेत. सगळ्या सरकारी शाळा विकत देण्यात येणार आहेत. खाजगी मालकांना काही मिळाले नाही, तरी जमिनी मिळतात त्यातच प्रचंड फायदा होतो. जसे मुंबईच्या कापड गिरण्या विकण्यात आल्या. तिथे कामगाराच्या थडग्यावर उंच इमारती बनल्या. एक दोन मंत्री व अधिकार्यांना प्रचंड पैसा मिळाला, पण लोखो कामगार उद्धवस्त झाले. ह्यालाच खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हणतात. याच्याबद्दल कुठलाही पक्ष एकशब्द देखील काढत नाही.
भ्रष्टाचार म्हणजेच खाजगीकरण. कोणी संगितले कि खाजगी कंपनी जास्त कार्यक्षम असते? खाजगी मालक कधी स्वत:चा पैसा घालतच नाही. तो बँकांचा पैसा घालतो. म्हणूनच अंबानी, गोयल, मल्ल्या सारख्या अनेक मालकांनी बँका बुडवल्या. पण मोदी त्याच अंबानीला राफेलचे कंत्राट देतात. स्टेट बँकच्या नेतृत्वाखाली ६ बँकांच्या समूहाने जेटला ८००० कोटीपेक्षा जास्त कर्ज दिले. जसे मल्ल्याला ९००० कोटी कर्ज दिले. त्यांनी बुडवले. आता सरकारी बँकांनी म्हणजेच जनतेच्या मालकीच्या बँकांनी जेट ताब्यात घेतले व गोयलचे कर्ज आपल्या डोक्यावर घेतले. रु.१ मध्ये ती कंपनी बँकाच्या आणि सरकारच्या मालकीची झाली. म्हणजे गोयलचे कर्ज आता सरकार भरणार. गोयल आणि खाजगी मालकांना काहींच होत नाही. त्यांची मालमत्ता जप्त होत नाही. त्यांचा कंपन्यांनी लुटून परदेशात नेलेला पैसा परत येत नाही. त्याला पळून जायला सरकार मदत करते. राजकर्ते घाबरतात कि त्यांना पकडले तर हे अंदर कि बात उघड करतील आणि राजकर्त्यांचे नाव घेतील. ह्याचा परिणाम गरिबावर होतो. शेतकरी कामगारांच्या मुलांसाठी असलेला सरकारी पैसा ह्या बदमाशाना वाचवण्यासाठी वापरला जात आहे. सरकार ह्या बदमाश लोकांना बंद करून त्यांची सारी मालमत्ता विकून कंपनी बंद का करत नाही? सर्व मालकांच्या मालमत्तेचा लिलाव का करत नाही? अनिल अंबानी पासून मालक जनतेचा पैसा बुडवतात, मोदीसाहेब माफ करतात आणि जनतेच्या बँकां बुडू नयेत म्हणून सरकार बँकांना जिवंत ठेवण्यासाठी पैसे देतात. जसे २५००० कोटी बँकांना वाचवण्यासाठी मोदीने दिले. कारण ८ लाख कोटी पेक्षा जास्त पैसा ह्या मोठ्या श्रीमंत मालकांनी बुडवला. ह्या पैशात भारताचे चीन विरुद्ध लढण्याची सर्व साधने आणि हत्यारे बनली असती. भारतातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असते. सर्व भारतीयांना मोफत आरोग्य सेवा देता आली असती. पण तोच पैसा खाजगी मालकांना वाचवण्यासाठी वापरला जातो.
आता जेटला ह्या बँकांनी ताब्यात घेतले आहे. रु.१५०० कोटी जेट मध्ये गुंतवून पुन्हा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे खाजगी कंपनीला बुड्ल्यानंतर सरकारी करण्यात येत आहे. ह्याचाच अर्थ खाजगीकरण अपयशी झाले आहे. किंग फिशरचे तेच झाले. प्रचंड पैसा बँकांनी दिला तो बुडला मल्ल्याची विमानसेवा बंद झाली. त्याबरोबर त्याची दारू सेवा देखील बंद झाली. मोठमोठ्या नेत्यांना, अधिकार्यांना मुली, मजा पुरवण्याचा धंदा पण बंद झाला. ह्या भाजप खासदाराला पळून जायला मोदी सरकारने पूर्ण मदत केली आणि मोदीसाहेब म्हणतात कि ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढतात. १५ लाख प्रत्येक भारतीयाला देण्याचे वचन देतात. ह्या गोयलने कामगारांचे पगार देखील अनेक महिने दिले नाहीत. म्हणून आता पगार सरकार देणार आहे. शेतकर्यांना मोदीसाहेब वर्षाला रु.२००० भिक देतात आणि बुडलेल्या खाजगी कंपनीच्या कर्मचार्यांना लाखो रुपये देता. गोयलची जगातील संपत्ती जप्त करून त्यांच्या कर्मचार्यांना का देत नाहीत ? आता जेट विकायचा प्रयत्न होत आहे. पण जेट कोण घेणार?
रु.१ मध्ये जेटची मालकी बँकांची आणि सरकारची करून त्यामध्ये गुंतवणूक करून जेट चालवणार आहे. भारत सरकार परदेशी लोकांच्या मालकीच्या कंपन्यांना का वाचवत आहे? प्रत्येक खाजगी मालकाला वाचवण्यासाठी का सरकार जनतेचा पैसा घालत आहे? सरकारने सरळ जेटला दिवाळखोर जाहीर करून त्या प्रक्रियेत घातले पाहिजे होते. कमीत कमी बरचसा बँकांचा पैसा परत मिळाला असता. दिवाळखोरी कायद्याप्रमाणे जेट वर कर्जदार ताबडतोब कारवाई करु शकले नसते. विमान चालू राहिले असते आणि कर्मचार्यांना पगार मिळत गेले असते. पण सरकार कुठेतरी गोयलला मदत करत आहे. गोयलचा पैसा परदेशात आहे. म्हणून हा नवीन मल्ल्या, निरव मोदी, चौकशी जन्माला येत आहे असं स्पष्ट दिसते.
शेवटी अमेरिकन भांडवलशाही मनमोहन सिंघने भारतात आणली; तीच भाजपने आणखी जोमाने पुढे चालवली. काही लोक प्रचंड श्रीमंत झाले. बदमाश, चोर, गुन्हेगार भांडवलशाहीत मजा मारत आहेत. पतिव्रता मरते आणि छीनाळ पेडा खाते. ही आहे आजची व्यवस्था जी कॉंग्रेसने आणली भाजपने चालवली. प्रचंड पैशाने राजकीय पक्षांना गुलाम केले. म्हणूनच भाजप शिवसेनेची युती अंबानी घडवतो आणि आमचे मोदी, ठाकरे, मनमोहन, पवार, मुंडी हलवतात. प्रसार माध्यमे भांडवलदारांच्या मालकीच्या आहेत. आमच्यासारख्या सत्य सांगणाऱ्या लोकांना प्रसार माध्यमानी बंदी घातली आहे. फक्त प्रकाश पोहरे सारखे काही पत्रकार हे लेख छापायची हिम्मत करतात. २०१९ च्या निवडणुकीचा मुख्य अजेंडा खाजगीकरण, जागतिकीकरण उदरीकरणाचे धोरण बंद करून पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या काळातील सरकार नियंत्रित आर्थिक धोरण बनले पाहिजे. हीच पुढील दिशा आहे आणि २०१९ च्या निवडणुकीचे मुख्य सूत्र हेच असले पाहिजे.
लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९