बाबरचा खरा इतिहास

भारताच्या इतिहासात बाबरची पहिली पानिपतची लढाई निर्णायक ठरली.  मोघली साम्राज्याचा पाया १५२६ ला करायला गेला तो थेट १८५७ पर्यंत चालला.  १८५७ च्या लढाईत सर्व भारतीयांनी शेवटचा मोघली सम्राट बहादूर शहा जफरला आपला राजा म्हणून इंग्रजांना नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघपणे लढा दिला.  मधल्या काळात १७०७ ला औरंगजेबनंतर मोघली साम्राज्य क्षीण झाले.  पण दिल्ली काबीज करून सुध्दा मराठ्यांनी किंवा इतर कुणी भारताचा सम्राट म्हणून स्वतःला प्रस्थापित केले नाही.  हेच गौडबंगाल कळत नाही.

बाबरच्या आधी अनेक मुस्लिम घराण्यांनी भारतावर राज्य केले.  पण बाबरला व मोघलांना जी मान्यता प्राप्त झाली ती कुणाला झाली नाही.  ह्याचे कारण शोधणे आवश्यक आहे.  कारण जात आणि धर्माचे राजकारण आजच्या व्यवस्थेचे मूळ सिद्धांत झाला आहे.  बाबर हा भारतातील पहिला इस्लामिक साहित्यकार होता.  त्याने आपले जीवन आपल्या लेखनात उतरविले आहे.  त्यालाच ‘बाबरनामा’ म्हणतात.  त्यात त्याने आपल्या आंतरिक विचारसरणी व खाजगी जीवनातील घटना देखील विस्तृतपणे मांडल्या आहेत.  पण आपल्या इतिहासकारांनी त्या कितपत लोकांसमोर मांडल्या आहेत हे सर्वांनाच माहीत आहेत. उलट आजच्या राजकारणातून खोट्या बातम्यांच पसरवण्याचा प्रयत्न झाला.  जसे बाबरी मस्जिदची घटना.  इतिहासात कुठेही नोंद नसताना,  बाबरने मंदिर पाडून मस्जिद बांधली असा प्रचार करून प्रचंड हिंसा घडवून आणली.  त्याचा फायदा कुणाला झाला?  तर राजकीय पक्षाला.  त्यात हिंदूंचा किंवा मुसलमानांचा काय फायदा झाला आहे.  शेतकरी कामगार मरत आहेतच.  म्हणूनच खरा इतिहास शोधून काढायचा हा प्रयत्न आहे.

त्या काळात शिवरायांसारखे सैन्य कुणाचे नव्हते.  तर मांडीलकी प्रस्थापित होती. म्हणून दिल्लीची मांडीलकी स्वीकारून आपल्या राज्याचे संरक्षण करणे हीच प्रथा होती.  जो दिल्लीत वरचढ होत असे त्याचे सरदार होण्यात राजे राजवाडे धन्यता मानत असत. राजे जमीनदारावर अवलंबून असत. प्रजेला कोण राज्य करत आहेत ह्याच्याशी देणे घेणे नव्हते.  गावातील पाटील, कुलकर्णी, देशमुख हेच प्रजेला आपले शोषणकर्ते मानायचे. हे राजे परिस्थिती प्रमाणे आपली निष्ठा बदलत असत.  मोघली साम्राज्य असेच होते.  म्हणूनच औरंगजेबने देखील शिवरायांना व संभाजी राजांना मनसबदारी देऊ केली होती. शिवरायांनी ते सगळे बदलले. जमीनदारी नष्ट केली व थेट रयतेशी संबंध गाठला.  म्हणूनच त्याला रयतेचे म्हणजेच सामान्य माणसाचे राजे म्हणतात.

बाबरचा इतिहास पूर्णपणे कुठेही मांडला गेला नाही. भारताच्या इतिहासावर निर्णायक परिणाम करणारे मोघल साम्राज्य भारतीय इतिहासकारांचा अभ्यासाचा विषय झाला नाही ही दुर्दैवाची बाब आहे.

बाबर हा १२ वर्षाचा असतानाच राजा झाला.  त्याचे वडील अचानक अपघातात दगावले.  फरगणाच्या गादीचा  ताबा घेण्याचा प्रयत्न तेथील पंतप्रधान आणि इतर दरबाऱ्यांनी केला.  बाबरच्या आजीने त्याला सावरले व विरोधकांना मारून बाबरला राजा केले .  तेव्हापासून ते भारतात येईपर्यंत बाबरला सतत युद्ध करावे लागले.  हिंदुकुश पार फरगणाचे राज्य मिळाल्यावर बाबरची नजर तैमूरची राजधानी समरखंडवर पडली.  बाबर स्वतःला तैमुरचा वंशज समजायचा.  त्याच्या  वडलांनी त्याच्यात समरखंडवर राज्य करण्याची जिद्द निर्माण केली.  बाबरने ३ वेळा समरखंडवर कब्जा केला.  पण समरखंडहुन नेहमी पलायन करावे लागले.  पहिल्यांदा  पाठीमागे त्याच्या सावत्र भावाने फरगण्यावर कब्जा करून, त्याला पदच्युत केले.  तो फरगणावर परत कब्जा करायला निघाला, तर समरखंडवर  दुसऱ्या भावाने कब्जा केला.

ना घरका ना घाटका अशी परिस्थिती झाली.  परत समरखंड वर हल्ला करावा लागला.  अनेक महिने वेढा देऊन स्वतः भुयारा द्वारे घुसून अल्प अश्या सैन्याद्वारा समरखंडवर  कब्जा केला.  त्यातच  त्याचा विरोधक शिबानी खानने तैमूरचा वंश संपवायचा विडा उचलला व समरखंडकडे कूच केले.  बाबरने वाटेतच त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. त्या युद्धात बाबर मरता मरता वाचला.  परत समरखंड वाचवण्यासाठी लढला पण नेस्तनाबूत होण्याची पाळी आली .  शिबानी खानने त्याला समरखंड वरून जाण्याचे अभय  दिले.  पण बाबरची बहीण मागितली.  ही मानहानी सहन करून बाबरला किल्ला सोडावा लागला.  खानजदा ही बाबरची बहीण बाबरला फार प्रिय होती. अनेक वर्ष तिला परत मिळवण्यासाठी बाबरचा जीव सलत होता.  बाबर राज्यविना भटकत राहिला.  शिबानी खान पासून पळत राहिला.  त्यात शिबानी खानने फरगणा काबीज करून तेथील बाबर कुटुंबियांची  कत्तल केली.  बाबरच्या भावाला हाल करून मारले. तेवढ्यात, वनवासात असताना इराणचा शाह इस्माईलने बाबरला अचानक भेट पाठवली.  शिबानी खानचे डोके. त्याला सैन्य पुरविले व समरखंडचा कब्जा मिळवून दिला. पण शिय्या होण्याची अट घातली. त्याबरोबर समरखंडचे लोक भडकले.  बाबरविरुद्ध उठले आणि बाबरला परत पलायन करावे लागले. परत राज्य गेले. रस्त्यावर आला.

त्यातच भारतावर आक्रमण करायचे स्वप्न बाबर बघू लागला. अनेक वर्ष वनवासात राहत गनिमी काव्याने लढत राहिला.  पण त्याला यश कुठेच मिळत नव्हते.  तेवढ्यात अफगाणिस्तानचा तैमुर वंशाचा  राजा मरण पावला. ते लोक शोधत बाबरकडे आले व बाबरला राजा होण्याची विनंती केली. हिंदुकुश पार करत काबुल पर्यंत पोहचताना बाबरचे अनेक लोक मरण पावले. शेवटी कसे बसे ते काबुलला पोहचले व भारतावर आक्रमण करायचे ठरले. पण सैन्य कमी होते. तिकडे दिल्लीचा बादशहा इब्राहिम लोदिकडे लाखोचे सैन्य होते. पण बाबरला तंत्रज्ञानांची मदत झाली. अचानक काबुलमध्ये त्याला नवीन हत्यारे, तोफा व दारू गोळा मिळाला. फक्त ३०००० चे सैन्य घेऊन बाबर निघाला.  २० एप्रिल १५२६ ला पानिपतची पहिली लढाई झाली.  तोफेमुळे हत्ती आणि घोडे बुजले. लोदिच्या सैन्याची धूळधाण झाली.

मोघलने साम्राज्याचा पाया रोवला.  हे सर्व स्वतः बाबरने आपल्या बाबरनाम्यात लिहून ठेवले आहे.  त्याचे विचार, त्याची स्वप्ने सर्व त्यात आहेत. पण सुरुवातीपासून बाबरने जिथे कब्जा केला तेथील रयतेवर अत्याचार केला नाही.  महिलांच्याही अब्रूचे रक्षण केले.  आपल्या सैनिकांनी महिलांवर अत्याचार केला तर त्याला कडक शासन केले आहे. मोघली सुलतानाने स्थानिक लोकांची विशेषतः राजपुतांची मने जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यामुळेच इंग्रजांप्रमाणे स्थानिक लोकांनाच आपलेसे करून बाबरने राज्य स्थापन केले.

बाबर हा अजिबात धार्मिक नव्हता.  उलट दारू, भांग, अफूचे सेवन करत होता. फक्त एकदाच त्याने जिहाद पुकारला.  राणासिंग त्याला कडवी झुंज देत होता. काही केल्या तो तावडीत सापडेना. बाबरने आपले सर्व सरदार बोलावले आणि जाहीर केले की तो दारू, नशाचा त्याग करतो आणि जिहाद पुकारतो.  अशाप्रकारे अनेक सम्राटांनी आणि आजच्या राजकर्त्यांनी धर्माचा उपयोग आपले स्वार्थ साधण्यासाठी केला आहे आणि करत राहतील. त्या लढाईत राणा सिंगचा मृत्यू झाला व मोघली साम्राज्य स्थापन झाले. लगेच बाबर दारू अफूचे सेवन करू लागला.

बाबरने आपल्या लोकांसाठी न्याय द्यायचा प्रयत्न केला. पण तो भारतात कधीच स्थिरावला नाही.  वारंवार त्याला त्याच्या  डोंगराळ भागाची आठवण येत असे. त्याने युद्ध समोरून केले. त्यामुळे छावण्यांचे मनोबल मजबूत राहिले.  तो मरणाच्या दारातून अनेकदा परत आला. तैमुरचा वंशज म्हणून आपण देखील तेवढेच पराक्रमी झालो पाहिजे अशी कायम जिद्द ठेवली.  पण तो फार काळ राज्य करू शकला नाही. १५३० मध्येच त्याचा अंत झाला.  पण हुमायूनमध्ये पण तीच जिद्द निर्माण करून त्याला पूर्ण तयार करून गेला.  बाबरचे शव काबुल येथे पुरण्यात आले.  आता युनेस्कोच्या निधीतून ते ठीक ठाक करण्यात आले आहे. पहिला मोघल भारतात आपले राज्य स्थापन करण्यासाठी आला आणि अजरामर झाला. मोघलांना राजपुतानी जवळ केले.  सामान्य जनतेला काहीच फरक पडला नाही.  कारण आजच्या प्रमाणेच काँग्रेस असो का भाजप असो काहींच फरक पडत नाही.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS