राष्ट्रपती राजवट आली_१४.११.२०१९

            विधानसभेचे निवडणूक झाली आणि राष्ट्रपती राजवट आली. कुठलेही सरकार बनले नाही, की बनवू दिले नाही. पण राष्ट्रपतींच्या नावावर राज्य करणार मोदी. म्हणूनच सरकार झाले नाही ते भाजचा पथ्यावर पडले. हे समजू  शकत नाही की इतका मूर्खपणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने कसा केला? काँग्रेसनी ह्या शिव आघाडीला विरोध करण्याचे सोंग केले. कुठल्यातरी बुरसटलेल्या विचारसरणीचा आधार घेऊन वास्तववादी राजकारणाला नजरेआड करून मोदींच्या हातात राजवट दिली.

          खरेतर काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीने निर्णायक आघाडी काँग्रेसवर घेतली आहे. शरद पवारने काँग्रेसला नामशेष करण्याची एकही संधि सोडली नाही. 1999 पासून तोच प्रयत्न चालू ठेवला आहे. त्यातून काँग्रेस समर्थकांचा पूर्ण नेतृत्व स्थापन करण्याचा व पुरोगामी  मतावर पूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. म्हणजेच मुस्लिम व अल्पसंख्याक लोकांचा आवाज फक्त राष्ट्रवादी आहे हे स्थापित करण्यात आता यशस्वी झाले आहेत.

‌          सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या तेंव्हा मी त्यांचा सचिव झालो. पहिली गोष्ट त्यांना सांगितली की पवारसाहेब पुढच्या निवडणुकी आधी  काँग्रेस तोडणार. त्यांचा विश्वास बसला नाही. पण मी तयारी केली. महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना थेट सोनियाजिंची भेट करून दिली. त्यांना पुढील युद्धासाठी तयार केले. प्रतापराव भोसले याना अध्यक्ष केले गेले. शरद पवार यांनी सोनिया गांधींवर परदेशी नागरिक असल्याचा दावा करून हल्ला चढवला. त्यावेळी मी एकट्यानेच त्यांना पक्षातून काढून टाका अशी जाहीर मागणी केली. काँग्रेस मुख्यालयाचा ताबा घेऊन अनेक ठिकाणी सुरक्षा दिली. पुढे कोणी येत नव्हते कारण सर्वांची समजूत होती की पुन्हा शरद पवार आपल्या डोक्यावर बसतील. त्यात राष्ट्रवादीची निर्मिती झाली मगच काँग्रेस नेते मंडळी येऊ लागली. पृथ्वीराज चव्हाण एक महिन्यानंतर अवतरले. 

          ‌त्यानंतरच्या काळात आम्ही काँग्रेसला विजय मिळवून दिला. पण सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादी बरोबर युती झाली आणि आमची मग पक्षाला अडचण झालो.  तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आधाडी चालत आहे.  त्यात काँग्रेसचे नेतृत्व विकलांग करण्यात आले व शेवटी आता शरद पवार यांनी काँग्रेसची जागा घेतली. 

          आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस न लढताच हरली.  जिंकण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही.  लोकांनीच त्यांना 44 जागा मिळवून दिल्या.  पुढच्या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करावे लागणार आहे.  शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष आणि निडर नेतृत्व आहे.  राष्ट्रवादी पक्षातील अर्धे नेते भाजपात गेले. पण न डगमगता त्यांनी लोकांकडे न्याय मागितला.  त्यांच्या या आक्रमक भूमिकेला लोकांनी प्रतिसाद दिला.  म्हणूनच पराभव होऊन सुद्धा ते जिंकल्याचे वातावरण महाराष्ट्रात झाले  व पुढच्या विजयाचा पाया रचला.  त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.  पुढची वाटचाल त्यांनी सर्व समावेशक पद्धतीने केली तर त्यांना भवितव्य चांगले आहे.

          काँग्रेसच्या हायकमांडने चमच्यांना नेते म्हणून पुढे केले तर काँग्रेसचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही.  हे मी अत्यंत दू:खाने नमूद करत आहे.   गेल्या 15 वर्षात काँग्रेसने निष्ठावंत कार्यकर्त्यांना ठोकारले. परिणामत: अनेक जिल्ह्यातून काँग्रेस नेस्तनाबूत झाले आहे. अनेक उमेदवारच्या दारुण पराभवावरून स्पष्ट होते. 

          निवडणुकीचे निकाल असे लागले की प्रचंड गोंधळ निर्माण झाला व सत्ता कुणीही बनवू शकले नाही.  राष्ट्रपती शासन म्हणजे केंद्र सरकारचे शासन याचाच अर्थ की पुढील काढत महाराष्ट्राच्या प्रत्येक निर्णयावर मोदी साहेबांचा पूर्ण  ताबा असणार आहे.  त्यामुळे मोदी आणि अमित शहा त्याचा वापर कोणत्या पद्धतीने करतात हे सर्वांनाच माहीत आहे.  म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीने कुठल्याही परिस्थितीत राज्यपालाला राष्ट्रपती शासन लागू करायची द्यायची नव्हती.  राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतींनिधी असतात हे माहीत नसण्याएवढे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते दूधखुळे निश्चितच नाहीत.  त्यातल्या त्यात शरद पवार यांना परिणामाची पूर्ण जाणीव आहे.  आता खेळ मोदीच्या हातात आहे, हे माहीत असून देखील अशी पाऊले काँग्रेस राष्ट्रवादीने का उचलली? याचे विश्लेषण केलेच पाहिजे.   शरद पवार यांनी भाजप सेनेच्या युतीला निर्णायकपणे संपवले.  त्यानंतर डाव त्यांच्या हातात आला.  शिवसेना पुर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहिली.   असे त्यांनी भासवले की शिवसेनेला राष्ट्रवादी पाठिंबा द्यायला तयार आहे पण काँग्रेस विरोध करते म्हणून राष्ट्रवादीचा नाईलाज आहे.  दुसरीकडे काँग्रेसच्या गोटामध्ये गोंधळ निर्माण झाला.  आमदारांच्या शपथविधी शिवाय निवडणुका लागल्या तर आमदारांना धोका निर्माण होईल.  म्हणून बहुसंख्य काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याचा आग्रह धरला.  त्याचबरोबर राष्ट्रवादी मुख्यमंत्री असला तरच काँग्रेस सरकारला पाठिंबा देईल.  याचाच अर्थ शरद पवार यांना मुख्यमंत्री बनवावे.  हा या सगळ्या कारस्थानाचा मूळ हेतु  होता.  शिवसेना हे ऐकणार नाही म्हणून शिवसेनेला कात्रीत पकडून जास्तीत जास्त फायदा कसा करता येतो किंवा शिवेसेनेला सरकारमध्ये मुख्यमंत्री देऊन सुद्धा अल्पमतात कसे ठेवता येईल ही व्युह रचना करण्यात आली.  शिवसेनेमध्ये अशा खेळात अनुभवी लोकांची कमतरता आहे.  पण शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातातले बाहुले बनण्याचा स्विकार केला. शरद पवार यांच्या मुत्सद्दीपणाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.  फक्त 55 आमदार असताना सुद्धा सर्व पक्षांना झुलवत ठेऊन सत्तेची सूत्र आपल्या हातात ठेवली आहेत.  

          या सर्व खेळीला चोख उत्तर द्यायला भाजपचे नेते सक्षम आहेत.  राज्यपालांच्या राजवटीमुळे निर्णयाचा हुकमी एक्का भाजपकडेच आहे.   तसे पाहिले तर  राज्यपालांनी सरकार बनवण्याचे आमंत्रण पहिले भाजपला दिले होते.  भाजप सरकार बनवू शकले असते व विधानसभेत बहुमत प्रस्थापित करण्याची संधी त्यांना होती.  त्यासाठी त्यांना तोड फोडचे राजकारण करावे लागले असते.  पण त्यांनी तो मोह टाळला व विरोधकांना सत्ता स्थापन करण्याची संधी देऊन उघडे पाडल्याचे राजकारण भाजपने केले आहे.  राष्ट्रपती राजवट लागू करून आपल्या हातात सत्ता ठेऊन पुढची दिशा ठरवायला भाजप मोकळे झाले आहे.  त्यातून काय निष्पन्न होईल हे आपण बघूच.  पण पुढे काही झाले तरी पुढच्या काळात अस्थिरतेचे राजकारण राहील.  या सर्व खेळीत सर्वात जास्त नुकसान महाराष्ट्रातील जनतेचे होत आहे, याचे भान कुणालाच राहिलेले नाही.  या सर्वांच्या पाठीमागे सत्तेचे दोर बड्या उद्योगपतींच्या हातात गेले आहेत.  ते लोक आपल्याला वाटेल ते निर्णय बनवून घेण्यास सक्षम आहेत.  त्यात मरण मात्र सामान्य जनतेचे होणार आहे.  

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS